पंजाबराव डख यांचा तो निर्णय…अन् शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया
सांगली : निसर्गाची लहर आणि अवकाळी पावसाचा कहर ज्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यातच आता हवामानाचा अंदाज व्यक्त करून शेतकरीवर्गात विशेष लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना मात्र, शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अखेर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज सांगणार नाही, असे जाहीर केले आहे. सध्या समाज माध्यमांवर आता त्याचीच चर्चा सुरू आहे.
शेतीमध्ये झालेले बदल आणि प्रगतीनुसार बांधावर असलेला शेतकरही आता हायटेक झाला आहे. हवामानाचा अंदाज आणि पिकपध्दती याचाही अभ्यास आता शेतकरी करत आहेत. त्यासाठी ते अनेकदा अभ्यासकांची मदत घेत असतात. पंजाबराव डख यांचाही हवामानाबाबतचा अंदाज संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून सांगलीसह सोलापूर, पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांनी डख यांच्या हवामान अंदाजाबाबत संताप व्यक्त केला आहे. पंढरपूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा अद्यापही बाजारपेठेत जाणार आहेत. तोवरच हवामानाचा अंदाज व्यक्त झाल्याने व्यापाऱ्यांकडून दर पाडून द्राक्षबागा मागितल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केवळ द्राक्षबागाच नव्हेतर इतरही पिकांच्या दरात घसरण होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला होता.
यानंतर काल गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील हवामानाचा अंदाज घोषित करणार नाही असे सांगितले. हवामानाचा अंदाज सांगण्यामागे शेतकरी पूर्वतयारी करावेत अशीच होते मात्र, त्यामुळे जर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर पाडले जात असतील, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असेलतर ते चूकीचे असल्याने या भागातील हवामानाचा अंदाज सांगणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.





