सांगलीत जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा
हवामान अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने पावसाच्या अनियमिततेचे पूर्वानुमान शक्य होत आहे. या वर्षी जून व जुलै महिन्यात कमी पाऊस व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
वारणाली वसाहतीतील सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, के. एल. मासाळ, प्रज्ञा पाटील, हर्षद यादव आणि राजन डवरी आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने जल व्यवस्थापनासाठी शाश्वत दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन राज्य स्तरावर सुरू असून, सर्वांच्या सहभागाने ते यशस्वी करण्यात येईल. या अनुषंगाने शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरत आहे असेही ते म्हणाले.





