
सांगली : मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणूक आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ऋषिकेश लाड यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. निवडीनंतर लगेचच विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला आणि पुढील काळात विकासकामांना गती देण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी त्यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार विशाल पाटील तसेच इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी आपल्या निवडीसाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
महाविकास आघाडीतील नेत्यांनीही ऋषिकेश लाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ऋषिकेश लाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाची गती वाढवणे हेच माझे उद्दिष्ट आहे.”





