फौजदारी वकिलीत सुद्धा महिलांनी अग्रेसर व्हावे
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे प्रतिपादन
सांगली न्यूज नेटवर्क
सांगली : फौजदारी वकिलीबाबत मनातील भीतीचा न्यूनगंड काढून टाकून महिलांनी फौजदारी वकिलीमध्येही अग्रेसर व्हावे असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी महिला वकिलांना दिला.
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अॅड. निकम बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या सरकारी वकील प्रियांका राणे-पाटील, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले, फौजदारी वकिली करताना महिला वकिलांना खूप अडचणी येत असतात. कष्टाळू आणि हुशार असतानाही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसोबत काम करताना काहीवेळा कुटुंबातील व्यक्तींच्या दबावामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. त्यामुळे मनातील भीतीचा न्यूनगंड काढून महिलांनी फौजदारी वकिलीमध्येही अग्रेसर व्हावे.
महिला पदाधिकारी, पुरस्कार प्राप्त वकील महिला, तसेच विविध निवडणुकीत विजयी वकील महिलांचा विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रमोद भोकरे यांनीही महिलांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी खेळ पैठणीचा, संगीत खुर्ची अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यात सर्वानी भाग घेतला.
ॲड.सुनीता मोहिते, ॲड.हेमलता पाटील, ॲड.भारती सोळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे संयोजन सुनीता मोहिते , सीमा सुतार, स्वाती सूर्यवंशी, सुनंदा पाटील, सुजाता कदम, मीरा पाटील, संगीता गोसावी, ज्योती बारडोल आदी महिला वकिलांनी केले. यावेळी सांगली, तासगांव, कवठेमहांकाळ, मिरज, कडेगांव, पलूस, ईश्वरपूर, जत, आष्टा येथील वकील संघटनेसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला वकील उपस्थित होत्या.





